'... तर गंभीर परिणाम भोगावे लागतील'
संयुक्त राष्ट्रात भारताचा पाकिस्तानला इशारा
नवी दिल्ली: प्रतिनिधी
काश्मीरची तुलना पॅलेस्टाईनशी करणाऱ्या पाकिस्तानला भारताने, दहशतवाद्यांना पोसले तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा सज्जड इशाराच संयुक्त राष्ट्र संघात दिला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अत्यंत आक्षेपार्ह विधाने केली. संयुक्त राष्ट्र संघातील भारताच्या राजनैतिक अधिकारी भाविका मंगलनंदन यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. जम्मू काश्मीरची तुलना पॅलेस्टाईनशी करणारे शरीफ यांचे विधान निव्वळ हास्यास्पद असल्याची टीका मंगलनंदन केली.
जगभरात दहशतवादाला पोसणारा देश अशी पाकिस्तानची ओळख आहे. आपल्या शेजाऱ्यांच्या विरोधात पाकिस्तान दहशतवादाचा शस्त्रासारखा वापर करतो. पाकिस्तानने सन १९७१ मध्ये नरसंहार केला. ओसामा बिन लादेनचा याच पाकिस्तानने दीर्घकाळ पाहुणचार केला होता. जम्मू काश्मीर येथे निवडणूक प्रक्रिया बाधित करण्याचे प्रयत्न पाकिस्तानने केले, याकडे मंगलनंदन संयुक्त राष्ट्रांचे लक्ष वेधले. पाकिस्तानने जर भारताविरोधात दहशतवादी पोसणे सुरूच ठेवले तर त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
शरीफ यांची बेताल वक्तव्य
पॅलेस्टाईनप्रमाणेच जम्मू काश्मीरची जनता आपले हक्क आणि स्वातंत्र्य यासाठी झगडते आहे, असे शरीफ म्हणाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे प्रस्ताव लागू करण्याचे वचन भारताने पाळले नाही. काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय भारताने मागे घ्यावा आणि जम्मू कश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानशी चर्चा करावी, अशा मागण्याही शरीफ यांनी केल्या.
भारतात इस्लामोफोबिया असल्याचा आरोप
भारतात इस्लामबद्दल विनाकारण भीती पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतातील हिंदुत्ववाद हे इस्लामोफोबियाचे लक्षण आहे. भारतात इस्लामचा वारसा पुसण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुस्लिमांना लाचार बनवण्याचे प्रयत्न होत आहेत, असे आरोप ही शरीफ यांनी केले.
Comment List