'केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा'
लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाचे पोलिसांना आदेश
बंगळुरू: वृत्तसंस्था
निवडणूक रोखे प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर गुन्हा दाखल करून प्राथमिक माहिती अहवाल नोंदवून घेण्यात यावा, असे आदेश येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार टिळक नगर पोलीस ठाण्यात सीतारामन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे.
राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीत पारदर्शकता यावी यासाठी केंद्र सरकारने सन 2018 मध्ये निवडणूक रोखे अर्थात इलेक्टोरल बाँड योजना अमलात आणली. या योजनेनुसार स्टेट बँक ऑफ इंडियामधून कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी आपल्या आवडत्या राजकीय पक्षासाठी रुपये एक हजार, दहा हजार, एक लाख, दहा लाख, एक कोटी अशा रकमेचे रोखे घेऊ शकत होते. या रोख्यांची रक्कम संबंधित पक्षाला दिली जात होती. रोखे घेणारे व्यक्तीचे अथवा कंपनीचे नाव बँक आणि राजकीय पक्षाकडून गोपनीय राखले जात असे. मात्र, विरोधक आणि स्वयंसेवी संस्था यांच्या विरोधामुळे सर्वोच्च न्यायालयाने ही योजना रद्द केली आहे.
निवडणूक रोखे प्रकरणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप जनाधिकार संघर्ष संघटनेचे आदर्श अय्यर यांनी केला आहे. त्यांनी निर्मला सीतारामन आणि अन्य संबंधिता विरोधात व्यक्तिगत तक्रार दाखल केली आहे. त्याची दखल घेऊन लोकप्रतिनिधींसाठी असलेल्या विशेष न्यायालयाने निर्मला सीतारामन यांच्यासह अन्य संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
Comment List