'किमान देवाला तरी ठेवा राजकारणापासून दूर'
तिरुपती देवस्थान प्रसादाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
नवी दिल्ली: प्रतिनिधी
किमान देव देवतांना तरी राजकारणापासून दूर ठेवा, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने राजकारण्यांना फटकारले आहे. तिरुपती देवस्थानमध्ये प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात माशाचे तेल आणि प्राण्यांची चरबी मिसळली जात असल्याच्या वादाबाबत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू थेट प्रसारमध्यमांकडे का गेले, असा सवालही न्यायालयाने केला आहे.
तिरुपती देवस्थानात प्रसाद म्हणून बनवल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या तुपात माशांचे तेल आणि प्राण्यांची चरबी वापरली जात असल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. त्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली. या आरोपांची चौकशी न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती भूषण आर गवई आणि न्यायमूर्ती के वी विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर होत आहे.
या सुनावणी दरम्यान सुब्रमण्यम स्वामी यांच्या वकिलाने सांगितले की, प्रसाद तयार करण्यासाठी लागणारी आवश्यक साधनसामुग्री कोणतीही तपासणी न होता सरसकट स्वयंपाकघरात नेली जाते. तपासात ही बाब स्पष्ट झाली आहे. वास्तविक हा देवाचा प्रसाद असून भाविकांसाठी अत्यंत पवित्र आहे. त्यामुळे त्याच्या निर्मिती प्रक्रियेचे नियंत्रण आणि तपासणी करणारी जबाबदारी यंत्रणा असणे आवश्यक आहे.
Comment List