'... तर महाराष्ट्राचे भरून न येणारे नुकसान'
सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारांना दिला इशारा
नागपूर: प्रतिनिधी
महाराष्ट्राला श्रेष्ठ राज्य घडविण्याची क्षमता केवळ डबल इंजिन सरकार मध्ये आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दुर्दैवाने महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले तर महाराष्ट्राचे भरून न येणारे नुकसान होईल, असा जणू इशाराच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारांना दिला आहे.
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आणि महाराष्ट्रातील महायुती सरकार लक्षणीय कामगिरी करत आहे. मात्र, ही कामगिरी विरोधकांच्या डोळ्यात खुपत आहे. लाडक्या बहिणीसाठी योजना आणली तर यांच्या पोटात दुखते. शेतकऱ्यांना मोफत वीज दिली तर यांना बघवत नाही, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
महाविकास आघाडी दुष्ट मायावी
महाविकास आघाडी दिवसेंदिवस दुष्ट मायावी रूपात पुढे येत आहे. त्यांच्याकडून खोटी कथिते (नरेटिव्ह) पसरवली जात आहेत. लोकांमध्ये भ्रम निर्माण करणारा प्रचार केला जात आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत महायुतीचे मताधिक्य घटले. विधानसभा निवडणुकीत ते वाढवावे लागणार आहे. त्यासाठीच गृहमंत्री अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
अमित शहा यांचा विदर्भ दौरा
अमित शहा यांची राजकीय मांडणी अतिशय मुद्देसूद, तर्कशुद्ध आणि सुसंगत असते. त्यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण होते. शहा यांच्या विदर्भ दौऱ्यात विदर्भातील पक्षाच्या सर्व जिल्हाध्यक्षांना पाचारण केले जाणार आहे. याशिवाय काही महत्त्वाच्या नेत्यांशी शहा व्यक्तिगत संवाद साधणार आहेत. विदर्भातील भाजप निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी किती प्रमाणात तयार आहे, यांचा आढावा या दौऱ्यात घेतला जाणार आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.
शहा यांचे मायक्रोप्लॅनिंग
अमित शहा यांचे निवडणुकीचे नियोजन लोकसभा मतदारसंघाचे नव्हे तर बूथ पातळीवरचे असते. निवडणुकीसाठी ते मायक्रोप्लानिंग करतात. त्यामुळे मतदानात उल्लेखनीय फरक पडतो. उत्तर प्रदेशात शहा यांनी तेच केले. मध्यप्रदेशात त्यांच्या नियोजनामुळे 230 पैकी 165 जागा भाजपने जिंकल्या. महाराष्ट्रातही या विधानसभा निवडणुकीत शहा यांच्या नियोजनाने महायुती यश मिळवेल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
जागावाटप सुरळीतपणे
जागा वाटपावरून महाविकास आघाडीत धुसफूस सुरू आहे. मात्र महायुतीतील घटक पक्षांमध्ये अतिशय सामंजस्याने जागावाटप होत आहे. सर्व घटक पक्षांमध्ये योग्य सुसंवाद आहे आणि जागावाटपाबाबत सर्व पक्ष समाधानी आहेत, असा दावा मुनगंटीवार यांनी केला.
Comment List