विधानसभा निवडणुकीत नेमके करायचे काय?
आठवड्यात निर्णय घेण्यासाठी अजितदादांवर दबाव
मुंबई: प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला वारंवार लक्ष्य केले जात असल्यामुळे अजित पवार गटात नाराजीची भावना आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक महायुतीतून लढवायची की स्वतंत्रपणे लढवायची याबाबत एक आठवड्यात निर्णय घ्या, यासाठी अजित पवार गटातील नेत्यांकडून अजित पवार यांच्यावर दबाव आणला जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अजित पवार गटातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. अजित पवार गटाकडून राज्यातील सर्व मतदारसंघात सर्वेक्षण करण्यात आले असून प्रत्येक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची नेमकी ताकद किती याचा आढावा सर्वेक्षणात घेण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळण्यामागे अजित पवार गटाला महायुतीत सामावून घेणे, हे प्रमुख कारण असल्याचे भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात नमूद करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या पातळीवरच्या नेत्या कार्यकर्त्यांनीही याची री ओढली. शिवसेना शिंदे गटातील अनेक नेतेही अजित पवार गटावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे अजित पवार गटाला महायुतीतून बाहेर पडण्यासाठी भाग पाडण्याचा कट रचला जात आहे, अशी भावना अजित पवार गटात निर्माण झाली असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीत राहायचे की नाही याबाबत त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी अजित पवार यांच्याकडे केली जात असल्याचे सांगितले जात आहे.
महायुतीत घडतंय महाभारत
महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात कथित बेबनाव असल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतेच एक लक्षणीय विधान केले आहे. मागील सहा महिन्यांपासून महायुतीत महाभारत घडत असल्याचे आपण सांगत आलो आहोत. त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उलटल्याशिवाय राहणार नाहीत, असे पटोले म्हणाले. जशी जशी निवडणूक जवळ येत जाईल तसे तसे महायुतीतील घटक पक्षांमध्ये खरोखर वितुष्ट आहे की विरोधकांकडून महायुतीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करण्यासाठी आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हे कथित पसरविले जात आहे, हे स्पष्ट होणार आहे.
Comment List