अहो आश्चर्य म्हसवड शहर परिसरातील अनेक वाहन चालकांकडे परवानाच नाहिये |
म्हसवड दि. २६
म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीत हजारोंच्या संख्येने दुचाकी व चारचाकी वाहने असुन ही वाहने दररोज विविध कारणाने धावत आहेत, मात्र ही वाहने चालवणार्या बहुतांशी चालकांकडे वाहन चालवण्याचा आवश्यक तो परवानाच नाही या मध्ये बहुसंख्य दुचाकीस्वारांकडे परवाना नसल्याचे समोर आले आहे.
आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा जसा कायदा आहे तसाच कायदा वाहनांसाठी असुन त्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार वाहन निरीक्षकांना व वाहतुक पोलीसांना त्याच कायद्याने दिलेले आहेत. मोटर वाहन कायद्यानुसार कोणतेही वाहन चालवण्यासाठी वाहन निरीक्षकांकडुन दिला जाणारा परवाना आवश्यक असतो त्या परवान्यानुसारच त्या चालकाला वाहन चालवण्याचा अधिकार प्राप्त होतो. वाहन चालकांकडे अशा प्रकारचा परवाना आहे की नाही हे तपासण्याचे काम हे स्थानिक वाहतुक करीत असतात ज्यांच्याकडे अशा प्रकारचा परवाना नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई हे वाहतुक पोलीस करीत असतात त्यामुळे कोणत्याही वाहन चालकाची समोर वाहतुक पोलीस पाहिल्यावर भंबेरी उडते, आता आपल्यावर कारवाई होणार यामुळे तो वाहन चालक नेहमीच पोलीसांची नजर चुकवण्याचा प्रयत्न करीत राहतो. पोलीसांना खरे तर हे अधिकार कायद्याने अपघात टाळण्यासाठी दिलेले आहेत, मात्र याठिकाणी वाहनचालकांकडुन ना पोलीसांकडुन याचे पालन केले जात नसल्याचे दिसुन येते त्यामुळेच आज एकट्या म्हसवड पोलीस स्टेशन च्या हद्दीत विनापरवाना वाहन चालवणार्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. या मध्ये सर्वाधिक संख्या ही दुचाकीस्वारांची आहे. आज प्रत्येक घरात माणसी दुचाकी आहे अगदी लहानांपासुन ते थोरांपर्यंत प्रत्येकाची स्वतंत्र दुचाकी आहे, कॉलेज व शालेय विद्यार्थ्यांकडेही दुचाक्या मोठ्या प्रमाणावर आहेत पण त्या सर्वांकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे का ? हे वाहतुक पोलीस कधी तपासतात का ? म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीत परवाना तपासण्याची मोहीम ही फक्त वरुन दिलेले टार्गेट पुर्ण करण्यासाठी केली जाते, एरव्ही मात्र पोलीसही त्याकडे साफ दुर्लक्ष करीत असतात त्यामुळे म्हसवड शहरात अल्पवयीन चालकांचा अगदी सुळसुळाट झाला आहे. पोलीसांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने गल्लीबोळात दुचाकीस्वारांची संख्या रोढावली आहे, पोलीसांनी याबाबत गांभीर्याने पाऊले उचलुन सुरुवातीला अशा दुचाकी स्वारांना समज द्यावी व त्या दुचाकीचा नंबर आपल्याकडे नोंद करुन घ्यावा त्यानंतरही अल्पवयीन व विनापरवाना वाहन चालक आढळुन आल्यास त्यावर हमखास कारवाई करावी त्यावेळी तो आमक्याचा, तो तमक्याचा हे न पाहता सरसकट कारवाई करावी पोलीसांनी अशी मोहीम तीव्रपणे राबवल्यास अल्पवयीन चालकांची व परवाना नसलेल्या दुचाकी स्वारांना नक्की चाप बसेल, यामुळे अपघात अथवा एखादी दुर्घटना नक्कीच टळेल या शिवाय पोलीसांचा वचकही कायम राहिल पण हे कधी तर जेव्हा पोलीस अँक्शन मोडवर येवुन प्रामाणिक पणे या कायद्याची अंमलबजावणी करतील तेव्हा मात्र म्हसवड शहरातील वाहतुकीला अन् वाहन चालकांनाही शिस्त लागेल एवढे मात्र नक्की शेवटी शिस्तीनेच राष्ट्र मोठं होते असे म्हणतात मग त्याची सुरवात आपल्या शहरापासुनच व्हावी एवढीच माफक अपेक्षा.०००
Comment List