'मुस्लिम मावळ्यांनी समुद्रात फडकवला स्वराज्याचा भगवा'
सुभान अली यांच्या वक्तव्याने मनसे संतप्त
मुंबई: प्रतिनिधी.
पूर्वी हिंदू परंपरेत सिंधुबंदी असल्याने हिंदू सैनिक आरमारात जात नसत. अशा वेळी मुस्लिम मावळ्यांनी आरमार लढवले आणि समुद्रात स्वराज्याचा भगवा फडकवला, असा दावा दंगलमुक्त महाराष्ट्र संघटनेचे संयोजक शेख सुभान अली यांनी केला. त्यांनी स्वराज्य स्थापनेत मुस्लिम समाजाच्या योगदानाबद्दल अनेक दावे केले. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा स्वराज्य स्थापनेच्या कार्याचे इस्लामीकरण करण्याचा डाव असून त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ आहे, असा आरोप मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला आहे .
छत्रपती शिवरायांची रत्नागिरी येथील बाबा याकुत यांच्यावर श्रद्धा होती. त्यांना महाराजांनी मशिदीसाठी मोठी जमीन दिली. महाराजांच्या ३१ अंगरक्षकांपैकी २० जण मुस्लिम होते. शिवाजी महाराजांच्या सव्वा लाख सैन्याचे सेनापती नूर खान बेग हे होते. तोफखाना प्रमुख इब्राहिम खान होते. सिद्दी हिलाल हे घोडदळ प्रमुख होते. घोडदळात ५८ हजार मुस्लिम स्वार होते. मौलाना काझी हैदर हे महाराजांचे कायदे सल्लागार, खाजगी सचिव आणि स्वराज्याचे पहिले सरन्यायाधीश होते. असे सगळे असूनही शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू होते, असा समज का पसरवला गेला, असा सवाल शेख यांनी केला.
शेख यांच्या या दाव्यांवर महाजन यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एक तर हिंदू धर्मात समुद्र सफर निषिद्ध असल्याचे कोठेही म्हटलेले नाही. प्रभू श्रीराम यांनी समुद्र ओलांडून रावणावर आक्रमण केले. समुद्र पार करूनच हिंदू संस्कृती बाली, इंडोनेशिया या देशात पोहोचली, असा दावा त्यांनी केला.
Comment List