'धर्मवीर- २ हा अत्यंत बोगस आणि काल्पनिक चित्रपट'
संजय राऊत यांची टीका
मुंबई: प्रतिनिधी
धर्मवीर- २ हा अत्यंत बोगस आणि काल्पनिक चित्रपट आहे. या चित्रपटातील काही दृश्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचे चारित्र्यहनन केले आहे. आनंद दिघे यांच्या निधनानंतर त्यांचा वापर राजकारणासाठी करून घेणे हा प्रकार तिरस्करणीय आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह खांद्यावर घेऊन विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयातील पायऱ्यांवरून उतरत असल्याचे दृश्य चित्रपटात दाखवण्यात आले आहे. हा दिघे यांचा आणि त्यांच्या हजारो समर्थकांचा अपमान आहे. हे दृश्य तद्दन काल्पनिक आहे. पैशाची लालच असल्यामुळेच कलाकार आणि लेखक असा चित्रपट करत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.
धर्मवीर आनंद दिघे यांचे संपूर्ण आयुष्य आमच्यासमोर आहे. त्यांच्याशी संबंधित अनेक घटनांचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यांच्या अनेक खटल्यांमध्ये मी साक्ष दिली आहे. धर्मवीर- २ चित्रपटातील कोणत्याही घटनांचा सत्य आणि वास्तवाशी काहीही संबंध नाही. हा तद्दन काल्पनिक चित्रपट आहे. कोणीही तिकीट काढून हा चित्रपट बघायला जाणार नाही. त्यामुळे त्याचे फुकट प्रदर्शन केले जात आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.
'तो' अधिकार फडणवीस यांना आहे का?
धारावी पुनर्बांधणी प्रकरणी कंत्राटदार अदानी कंपनीने आमच्या ऐकले नाही तर आम्ही त्यांचे कंत्राट रद्द करू, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाची राऊत यांनी खिल्ली उडवली. अदानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे लाडके उद्योगपती आहेत. त्यांना दिलेले कंत्राट रद्द करण्याचा अधिकार फडणवीस यांना आहे का, असा बोचरा सवाल राऊत यांनी केला.
... ही धारावीकरांची इच्छा
धारावीचे आंदोलन शिवसेनेने लावून धरले आहे. धारावीकरांची शिवसेनेने कायम पाठराखण केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त धारावी मतदारसंघातून शिवसेनेने निवडणूक लढवावी, अशी मागणी धारावी बचाव आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार केली आहे. ही धारावीकरांची इच्छा आहे. ती आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालू. त्याचप्रमाणे काँग्रेसशीही याबाबत चर्चा करू, असेही राऊत म्हणाले.
Comment List