'... तर महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणू'
प्रकाश आंबेडकर यांनी मांडले नवे राजकीय समीकरण
मुंबई: प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी नवे राजकीय समीकरण मांडले आहे. त्यानुसार महायुती मंत्रिमंडळातील छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे आपल्या सोबत आले तर महाराष्ट्रात एक हाती सत्ता आणू, असा दावा त्यांनी केला आहे.
छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी इतर मागासवर्गाचे संघटन आपल्या पाठीशी उभे केल्यास महाराष्ट्रात एकहाती सत्ता प्रस्थापित करणे शक्य आहे, असे आंबेडकर यांनी नमूद केले. शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठीही आपले दरवाजे खुले आहेत, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले. आपण कोणाबरोबरही चर्चेला तयार आहोत. मात्र, आम्ही स्वतःहून कोणाच्या दारात जाणार नाही, असेही आंबेडकर यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत होत असल्याचे चित्र आहे. उमेदवारीवरून सर्वच पक्षांमध्ये काही नेते नाराजीच्या सूर काढत आहेत. त्यामुळे पक्षापक्षांमध्ये इन्कमिंग आउटगोइंग सुरू आहे. त्यातच आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातींमध्ये ध्रुवीकरण होत असल्याचेही दिसून येते. या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी दलित - ओबीसी एकीकरणाचे नवे समीकरण मांडल्याने राजकीय वर्तुळात त्यावर चर्चा सुरू आहे.
Comment List