ना ठाकरे ना फडणवीस पुढचा मुख्यमंत्री मीच...
रामदास आठवले यांचा दोन्ही नेत्यांना प्रेमळ इशारा
पुणे: प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकमेकांबद्दलचा राग विसरून पुन्हा मैत्री करावी. या दोघांमधला वाद मिटला नाही तर महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री मीच होईन, असा प्रेमळ इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दोन्ही नेत्यांना दिला आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी आलेले रामदास आठवले यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.
फडणवीस आणि ठाकरे यांचे एकमेकांशी कनिष्ठ संबंध होते. त्यांची पुन्हा मैत्री व्हावी, अशी आपली इच्छा आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांबद्दलचा राग विसरावा आणि पुन्हा एकत्र यावे, अशी भावना आठवले यांनी व्यक्त केली. ठाकरे आणि फडणवीस आपले वाद विसरून एकत्र आले नाहीत तर महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच असेन, असे विधान आठवले यांनी करताच उपस्थितांमध्ये हास्याची लाट उसळली.
एकेकाळी एकत्र सत्ता उपभोगलेले ठाकरे आणि फडणवीस यांच्यातून विस्तव जात नाही अशी सध्याची अवस्था आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या मेळाव्यात बोलताना, आता मैदानात उतरा आणि पक्षाबद्दल अपप्रचार करणाऱ्यांना, पक्षाच्या नेत्यांवर टीका करणाऱ्यांना ठोकून काढा, असे फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. त्याला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे मुंबईतील शाखा प्रमुखांच्या बैठकीत म्हणाले की, जर कुणी हात उगारला तर उगारलेला हात जागेवर शिल्लक ठेऊ नका.
Comment List