वडगाव शेरीतून बसपचे डॉ हुलगेश चलवादी रिंगणात
मतदारसंघाची उपेक्षा संपुष्टात आणण्याचा व्यक्त केला निर्धार
पुणे: प्रतिनिधी
सन २००९ पासून वडगाव शेरी मतदारसंघात निवडून आलेल्या वेगवेगळ्या आमदारांकडून मतदारसंघाची उपेक्षाच झाली आहे. त्यामुळे मतदारांमध्ये ही निराशेची भावना आहे. आतापर्यंत झालेली वडगाव शेरीची उपेक्षा संपुष्टात आणून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी कसून प्रयत्न करू, असा निर्धार हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाकडून चलवादी हे वडगाव शेरी मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत.
नवीन रचनेप्रमाणे सन २००९ मध्ये निवडणुका झाल्या तेव्हापासून एकच समूहाचे तीन आमदार या ठिकाणी निवडून आले असून इतर समूहातील एकही उमेदवार आतापर्यंत निवडून आलेला नाही. इतर समूहातील लोकांची संख्या जास्त असूनसुद्धा त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. जे कोणी या भागातून निवडून गेले त्यांनी सामान्य नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारचे काम केले नसून मोठ्या भांडवलदारांसाठी ते काम करीत आहेत. त्यामुळे या भागाचा विकास झाला नाही, असा आरोप चलवादी यांनी केला आहे.
सरकारी शाळेची दुर्दशा, विद्यार्थ्यांसाठी चांगल्या शिक्षण सुविधांचा अभाव, नागरिकांना आवश्यक असलेल्या नागरी सुविधांचा अभाव, रोजगार नसल्यामुळे युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात फोफावत असलेली गुन्हेगारी, वाहतूक व्यवस्था व रस्त्याचे नियोजन नसल्याने चुकीच्या रस्त्यांची उभारणी आणि त्यामुळे वाहतूक खोळंबा, भूमिगत विद्युत उपकरणे नसल्याने अपघाती मृत्युचे वाढते प्रमाण, म्हाडाच्या घराच्या दुरावस्था व मोठ्या प्रमाणात विकासाकडे दुर्लक्ष, झोपडपट्टी पुनर्वसनाच्या कायद्यात बदल करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष अशा समस्यांकडे चलवादी यांनी लक्ष वेधले.
दगडांच्या खाणीत भरलेल्या पाण्याचा योग्य वापर न झाल्यामुळे तो अपघाताचा पॉईंट ठरलेला आहे. लहान मुले रस्त्यावर भीक मागतात. भिक्षेकर निवास असतानासुद्धा त्या मुलांकडे व त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. जमिनीची खरेदी विक्री बंद केल्याने अनेकांना मनस्ताप होत आहे तसेच घर, जमीनीपासून अनेकांना वंचित ठेवले असून त्यामध्ये फसवेगिरीत वाढ झाल्याचे दिसून येत असल्याचे चलवादी यांनी नमूद केले.
गुंठेवारी व भरमसाठ दंड आकारणी, त्याचबरोबर टोलचे प्रश्न, पुराच्या पाण्याचे योग्य नियोजन नसणे, केंद्रशासन, राज्य शासन व महापालिकेच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात नाही. झोपडपट्टी वसलेल्या ठिकाणी अग्निशामन दलाचे नियोजन नाही. एमआयडीसी व रोजगार निर्माण करण्याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने अनेक युवक बेरोजगार झाले आहेत. ससूनच्या धर्तीवर रुग्णालयाचे नियोजन नसल्यामुळे अनेक नागरिकांना त्याचा मनस्ताप होत आहे. सौर ऊर्जा प्रचार, प्रसार व कृतीवर शासन निष्क्रिय ठरले आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या सर्व बाबी विचारात घेऊन यावेळी सर्व नागरिक मला जनतेची सेवा करण्याची संधी देतील, असा विश्वास असे बसपाचे प्रदेश महासचिव हुलगेश चलवादी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
बसपा सामाजिक मुद्द्यांबरोबर विकासाच्या मुद्द्यांवर निवडणुकाला सामोरे जाणार आहे, असेही ते म्हणाले. बसपा महाराष्ट्रमध्ये सर्वच्या सर्व 288 जागा लढणार असून सर्व जागा लढणारा बसपा एकमेव पक्ष ठरणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Comment List