'महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन करणार, हा आपला शब्द'
अमित शहा यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिली ग्वाही
मुंबई: प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन करून दाखवणार, हा आपला शब्द आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना केले.
अमित शहा हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या आगमनानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. या दौऱ्यात शहा हे मुंबई आणि कोकणातील विधानसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. 'शक्ती कार्यकर्त्यांची, प्रचिती आत्मविश्वासाची' हे बोधवाक्य घेऊन भाजपच्या वतीने शहा यांच्या उपस्थितीत संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
पुढील लोकसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता
सन 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर भाजपचे सरकार स्थापन करणार असल्याचा निर्धार शहा यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत संख्याबळ घटल्याने कोणीही निराश होण्याचे कारण नाही. ज्यावेळी लोकसभेत पक्षाचे फक्त दोन खासदार होते त्यावेळी देखील कोणी धीर सोडला नाही अथवा पक्ष सोडला नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण ताकतीने आणि आत्मविश्वासाने कामाला लागा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
Comment List