माण - खटाव विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी |
म्हसवड दि. १ ( महेश कांबळे )
राज्यात आगामी होवु घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीची धामधुम सुरु झालेली आहे, अनेक इच्छुकांनी उमेदवारी आपल्यालाच मिळावी म्हणुन अक्षरशा देव पाण्यात घातले आहेत, सातारा जिल्ह्यातील माण - खटाव विधानसभा मतदार संघात हेच चित्र आहे, एकीकडे उमेदवारीवरुन या मतदार संघात रस्सीखेच सुरु असतानाच आता याच मतदार संघातुन शरदचंद्र पवार गटातुन अनुराधा देशमुख यांनाच उमेदवारी द्यावी अशी नवी मागणी मोठ्या प्रमाणावर विशेषत: महिला वर्गातुन होवु लागली असुन महिलांच्या या नव्या मागणीवरुन माण - खटाव विधानसभा मतदार संघात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
सातारा जिल्ह्यात सर्वात हॉट मतदारसंघ म्हणुन माण - खटाव विधानसभा मतदार संघ ओळखला जातो, या मतदार संघावर गत १५ वर्षापासुन भाजपचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांची सत्ता आहे, असे असले तरी याच मतदार संघात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग असुन त्यांची आजअखेर या मतदार संघावर मजबुत पकड आहे. पवार साहेबांची या मतदार संघावर असलेली पकड पाहुनच यंदाच्या निवडणुकीत हा मतदारसंघ हा महा विकास आघाडीतुन शरदचंद्र पवार गटाकडे जाण्याची सर्वाधिक शक्यता आहे. या शक्यतेमुळेच या मतदार संघातुन आपल्याच उमेदवारी मिळावी यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरु केले आहेत. माण आणी खटाव तालुक्याचा बहुतांशी भाग या मतदार संघात येत असल्याने महाविकास आघाडीतुन प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, प्रभाकर घार्गे, रणजित देशमुख, अभय जगताप, शेखर गोरे यांच्यासह अन्य ही इच्छुकांनी येथुन निवडणुक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. या सर्वांनी आपआपल्या परिने मेळावे, भेटीगाठी सुरु केल्या असल्या तरी अद्याप येथुन उमेदवारी कोणालाच मिळालेली नाही असे असले तरी अनेकांच्या कार्यकर्त्यांनीही यंदा आमचाच नेता फिक्स आमदार असे फ्लेकस् झळकावलेले आहेत. या सर्वच इच्छुकांना आ. गोरेंचा पाडाव करावयाचा आहे असेही इच्छुक उमेदवार सांगत असुन सोशल मिडीयावर त्यासाठी त्यांच्या रोज नव नवीन पोष्टही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. असे असले तरी अनेक इच्छुकांच्यामुळे उमेदवारीचा येथील तिढा अधिकच गुंतागुंतीचा ठरु लागला आहे. गतवेळी एक संघ असलेल्या राष्ट्रवादी पक्षाने येथुन अपक्ष असलेल्या प्रभाकर देशमुख यांना पाठींबा दिला होता. तर एक संघ असलेल्या शिवसेनेने येथे भाजपसोबत मैत्री पुर्ण लढत करीत शेखर गोरे यांना उमेदवारी दिली होती. या लढतीत अपक्ष असलेल्या प्रभाकर देशमुख यांचा अल्प मताने पराभवास सामोरे जावे लागले होते. देशमुख यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादी ने घेतलेल्या चिंतन बैठकीत देशमुख यांना उशीरा उमेदवारी दिली गेल्याने प्रचाराला वेळ अपुरा पडल्याचा एकत्रित सुरु त्यांच्या सहकार्यांनी व कार्यकर्त्यांकडुन आवळला गेला. त्यानंतर आता पुलाखालुन बरेच पाणी वाहुन गेले असुन एक संघ असलेल्या राष्ट्रवादी व शिवसेनेचे गट निर्माण झाले असुन दोन्ही पक्षाचे एक एक गट राज्यातील महायुतीच्या सत्तेत सहभागी आहेत तर एक गट विरोधात असलेल्या महाविकास आघाडीत आहे. महायुतीतुन येथील जागा भाजपलाच जाणार असल्याचे अधोरेखीत असल्याने आ. गोरेंचा येथे झंझावात सुरु आहे. मात्र आ. गोरेंचा हा झंझावात रोखण्यासाठी यंदा पुन्हा महाविकास आघाडीने मोट बांधली आहे, मात्र हा झंझावात नक्की रोखणार कोण ? हा खरा प्रश्न श्रेष्ठींसमोर आहे. एकाच पक्षातुन अनेकजण इच्छुक असल्याने ज्याला उमेदवारी मिळणार नाही त्याची भूमिका काय राहिल याकडे याचे चिंतन सध्या पक्षश्रेष्ठी करीत आहेत. गतवेळी झालेल्या पराभवाचे कारण उशीरा उमेदवारी असे दिल्याने यंदा लवकर उमेदवारी एखाद्यास दिल्यावर नाराजी, बंडाळीची भितीही या श्रेष्टींसमोर निश्चीातच असणार आहे. त्यामुळेच येथील उमेदवारीचा तिढा दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचा ठरु लागला आहे. सर्वच इच्छुकांच्या महत्वकांक्षा ह्या अधिक मोठ्या असल्याने थांबायचे कोणी व त्यांना थांबवायचे कसे याचा मोठा पेच महाविकास आघाडीसमोर निर्माण झाला आहे.
महाविकास आघाडीत निर्माण झालेला हा पेच सोडवण्यासाठी आता येथील रणरागिणी पुढे सरसावल्या असुन उमेदवारीचा तिढा सोडवायचा असेल तर महाविकास आघाडीने अनुराधा प्रभाकर देशमुख यांना येथुन उमेदवारी द्यावी आणी नारी शक्ति असलेल्या महिलांचा सन्मान करावा अशी नवी मागणी पुढे येवु लागली आहे.
अनुराधा देशमुख या जरी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या पत्नी असल्या तरी त्यांनी स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा माण - खटाव मतदार संघात प्रचंड असा जनसंपर्क आहे. प्रत्येक जाती, धर्मातील महिलांचे त्यांनी मोठे संगठन उभारले आहे. त्यांची सामान्य वर्गासाठी असलेली तळमळ ही अनेकांसाठी आधारवड ठरलेली आहे. मुला, मुलींचे शिक्षण, महिलांचे सक्षमीकरण, महिलांचे प्रबोधन अशा अनेक सामाजिक कार्यात त्या नेहमीच अग्रस्थानी राहिलेल्या आहेत. कोरोना काळात तर त्यांनी केलेल्या मदतकार्यास त्यांना अनेक समाजिक संघटनांकडुन राज्य स्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांनी ड्रीम सोशल फौंडेशनच्या नावाने सुरु केलेले सामाजिक कार्य हे वाखण्याजोगे असल्यानेच दस्तुरखुद पवार साहेबांनीही त्यांचा गौरव या पुर्वी केलेला आहे. कोरोना काळात अनेकांना जिवदान देणारी ही रणरागिणी जर विधानसभेच्या आखाड्यात उतरली तर सातारा जिल्ह्यातील महिलांची मान आणखी उचवणार तर आहेच, पण ज्या पक्षाकडुन त्यांना उमेदवारी मागितली जात आहे त्या शरदचंद्र पवार गटाच्या पाठीशी नारी शक्ति ची मोठी ताकत उभी राहणार आहे. विशेष म्हणजे राज्यातील शरद पवार हे एकमेव असे नेते आहेत की ज्यांनी सर्वप्रथम राज्याच्या राजकारणात महिलांना आरक्षण लागु केले आहे, अन् आता माणच्या राजकारणातही त्यांनी महिलांना संधी देवुन महिलांचा सन्मान वाढवुन आपल्या पक्षात उमेदवारी वरुन निर्माण झालेला तिढा एका इटक्यात सोडवावा. शेवटी असे म्हणतात एक स्त्रीच कुटुंबाला एकत्रित बांधुन ठेवते म्हणुनच कदाचित असे म्हटले जाते की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते. मग ती स्त्री घरातील व्यक्तीच्या असो अथवा राजकिय पक्षाच्या पाठीशी असो.
पवार साहेबांनी अनुराधा देशमुख यांना येथुन उमेदवारी दिल्यास महिलांचा सन्मान तर होईलच या शिवाय महिलांना आपलाच पक्ष राजकिय आरक्षण देवु शकतो यावर पुन्हा एकदा अधोरेखीत होईल आणी माण - खटाव मधील नारीशक्ती किती मोठी व ताकतवर आहे हे सर्वांसमोर येईल. व माण - खटावच्या जनतेला एक उच्च विद्या विभुषीत उमेदवार मिळेल यात शंका नाही.०००
Comment List