'आरक्षण संपवण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांचे एकमत'
प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप
जळगाव: प्रतिनिधी
आरक्षण कायमचे संपवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या सर्व प्रमुख पक्षांचे एकमत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. आरक्षण टिकवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.
युती आणि आघाड्यांचे राजकारण होतच राहणार आहे. मात्र, आरक्षण कायमचे बंद व्हावे, या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना ठाकरे गट हे चारही पक्ष आहेत. त्यांच्या पडद्यामागून आरक्षण संपविण्याच्या हालचाली सुरू आहेत, असा आरोप आंबेडकर यांनी केला. आरक्षण कायम राहावे यासाठी वेळ पडल्यास वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असेही आंबेडकर यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावर
आगामी विधानसभा निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढवली जाणार आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर या निवडणुकीत मतांचे ध्रुवीकरण होणार आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण बचाव आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आरक्षण संपावे हा विचार असलेले लोक यांच्यामध्ये मते विभागली जाणार आहेत, असे आंबेडकर म्हणाले.
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या
मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांची मागणी सरकार पूर्ण करू न शकल्यामुळे तो कळीचा मुद्दा ठरला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, ओबीसी आरक्षण ओबीसींनाच मिळाले पाहिजे. त्यात इतरांचा समावेश केला जाऊ नये, ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
Comment List