कृषी उत्पादनांच्या दर्जात वृद्धी करण्यासाठी होणार मानकांची निर्मिती
राष्ट्रीय मानक संस्था तयार करणार राष्ट्रीय कृषी संहिता
नवी दिल्ली: प्रतिनिधी
कृषी मालाचा दर्जा वृद्धिंगत करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. कृषीमालचे उत्पादन आणि प्रक्रिया यासाठी राष्ट्रीय मानक संस्था राष्ट्रीय कृषी संहिता तयार करणार आहे. त्यामुळे कृषी उत्पादनांचा दर्जा वाधूनु त्याची विशेषतः प्रदेशात मागणी वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
काही काळापूर्वी भारतातून निर्यात झालेल्या मसाल्याच्या पदार्थांमध्ये घातक कीटकनाशकांचा अंश आढळल्यामुळे जगभरात खळबळ माजली. अनेक देशांमध्ये भारतीय मसाल्याच्या पदार्थांवर बंदी घालण्यात आली. भारत हा मसाल्याच्या पदार्थांचा प्रमुख निर्यातदार देश आहे. त्यामुळे या घटनेचा जगभरातील मसाल्याच्या बाजारपेठेवर परिणाम झाला. त्यामुळे सरकारने कृषी मालाचा दर्जा निश्चित करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत.
यापूर्वी भारतातील कृषी माल, विशेषत: मसाल्याच्या पदार्थांना जगभरात मोठ्या प्रमाणावर मागणी होती. भारतीय कृषिमाल दर्जेदार मानला जात असे. मात्र, उत्पादन वाढीच्या दृष्टीने रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा प्रमाणापेक्षा अधिक वापर होत असल्यामुळे कृषी उत्पादने दूषित बनली. आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेषतः अन्नपदार्थांचे काटेकोररित्या परीक्षण केले जात आहे. त्यामुळे भारतीय कृषी मालाचा दर्जा टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी पावले उचलली जात आहेत.
सोने-चांदीसारखे मौल्यवान धातू, कापड, तयार कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा अनेक प्रकारच्या उत्पादनांना हॉलमार्किंग आणि स्टार रेटिंग देण्यात येते. हॉलमार्क आणि स्टार रेटिंग म्हणजे सरकारने संबंधित वस्तूच्या दर्जाची घेतलेली हमीच होय. अशाच प्रकारे कृषी मालाची गुणवत्ता आणि दर्जा वाढवण्यासाठी, त्याबाबत विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय कृषी संहिता निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे भारतीय कृषी मालाची विश्वासार्हता जगभर निर्माण होऊन त्याची निर्यात वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Comment List