माणगंगेच्या पाण्याने मासाळवाडी तलाव भरावा - अरविंद पिसे |
म्हसवड दि. २७
माण तालुक्याची अस्मिता म्हणुन ओळखल्या जाणार्या माण गंगा नदीपात्रात सध्या मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा उपलब्ध झाला असुन या नदीवर असलेले सर्व बंधारेही भरले आहेत, त्यामुळे माणगंगा नदीतुन गत दोन महिन्यांपासुन अखंडीतपणे राजेवाडी तलावात पाणी वाहुन जात आहे, प्रशासनाने हे वाहुन जाणारे पाणी अडवुन ते म्हसवड हद्दीतील मासाळवाडी येथील तलावात सोडावे व या भागातील जनतेला दुष्काळमुक्त करावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांनी केली आहे.
माण - खटावच्या माथी कायम दुष्काळी असा शिक्का मारला गेला आहे, मात्र हा दुष्काळी शिक्का हा नैसर्गिक नसुन तो मानव निर्मित असा आहे. सातारा जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस हा माण तालुक्यात पडतो, मात्र जेवढा पाऊस माण तालुक्यात पडतो तेवढ्या पाऊसावरच येथील दुष्काळावर मात करता येवु शकते दुष्काळावर मात करण्यासाठी येथील शेतकरीवर्गाची, सामान्य जनतेची खुल मोठी तयारी वा मानसिकता आहे, मात्र तीच मानसिकता, तयारी येथील प्रशासनाची व राजकिय पुढार्यांची, लोकप्रतिनिधींची नाही त्यामुळे माण तालुक्यात पाण्याचे कायम दुर्भिक्ष दिसुन येते. माण तालुक्याला कायम सोडले जाणार्या पाण्यावर अवलंबुन रहावे लागत आहे, माण तालुक्याला सोडण्यात येणारे पाणी हे फक्त पावसाळ्यातच सोडले जाते. तेही सांगली जिल्ह्याची गरज ओळखुन अन् जे पाणी सोडले जाते ते पाणी येथील शेतकर्यांना न परवडणारे असे आहे. त्या पाण्यासाठी त्याच्यापोटी येणारे भलेमोठे विजबील शेतकर्यांना आपल्या खिशातुन भरावे लागते त्यामुळे विकतचे पाणी शेतकरी आणखी किती दिवस घेणार त्यापेक्षा माण तालुक्यात पडणार्या पाऊसाच्या पाण्याचे नेटके नियोजन केले तर अशी वेळंच येथील शेतकर्यांवर येणार नाही.
सध्या येथील माण गंगा नदी गत दोन महिन्यांपासुन वाहत आहे, पावसाळा सुरु होताच उरमोडीचे पाणी माणगंगा नदीपात्रात सोडण्यात आल्याने सध्या माणगंगा अहोरात्र वाहु लागली आहे, अशातच पावसाची वरचेवर संततधार सुरु असते त्यामुळे माणगंगा नदीवरील सर्व बंधारेही भरभरुन वाहु लागल्याचे चित्र आहे. गत दोन महिन्यांपासुन माणगंगा नदी अखंडीतपणे वाहत असुन हे सर्व पाणी राजेवाडी तलावात जात आहे, राजेवाडी तलाव हा जरी माण तालुक्याच्या हद्दीत काही प्रमाणात येत असला तरी त्या तलावातील पाण्याचा उपयोग हा नजीकच्या सांगली व सोलापुर जिल्ह्याला होत आहे, त्यामुळे पाणी आपले अन् वापर इतरांचा असे चित्र आहे. हे चित्र बदलण्यासाठी व माण तालुक्याचा शेतीपाणी प्रश्न सोडवण्यासाठी माण तालुक्यात पडणार्या पाऊसाच्या पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. सध्या माणगंगा नदीपात्रातुन वाहुन जाणारे पाणी जर आपण म्हसवड हद्दीतील मासाळवाडी तलावात सोडु शकलो तर मासाळवाडीचा आज ही कोरडा ठाक असलेला हा तलाव भरुन जाईल त्यामुळे हजारो हेक्टरचे क्षेत्र हे ओलीताखाली निश्चित येईल मासाळवाडीचा कायम कोरडा ठाक असलेला तलाव भरल्याने त्याचा मोठा फायदा म्हसवड शहरालाही होणार आहे. हे काम सहज होणार आहे मात्र त्यासाठी हवी आहे ती फक्त मानसिकता. जोवर माण तालुक्याला दुष्काळ मुक्त करण्याची राजकिय नेत्यांची, प्रशासनाची मानसिकता होत नाही तोवर काहीच होणार नाही. यांची जर मानसिकता होत नसेल तर आता सामान्य जनतेनेच यासाठी संगठित होवुन आवाज उठवण्याची वेळ आली आहे, आवाज उठवणार्याच्या पाठीशी उभे राहुन परिवर्तन घडवु पाहणार्यानी परिवर्तनाच्या या लढाईत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहनही शेवटी पिसे यांनी केले आहे.०००
Comment List