शरदचंद्र पवार गटाची मलाच उमेदवारी - अजिनाथ केवटे |
म्हसवड दि. २४
आगामी होवु घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात महा विकास आघाडीला घवघवीत यश मिळणार असल्याचे सामान्य जनतेला वाटत असल्यानेच महा विकास आघाडीकडुन माण - खटाव विधानसभा मतदार संघातुन निवडणुक लढण्यास अनेकजण इच्छुक आहेत, असे असले तरी येथील जागा ही शरदचंद्र पवार पक्षाला सुटण्याची सर्वाधिक शक्यता असुन याच पक्षाच्या चिन्हावर आपण निवडणुक लढवणार आहे, अन् मलाच येथील उमेदवारी मिळणार असल्याचा दावा म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ लक्ष्मण केवटे यांनी केला आहे.
पवार गटाकडुन इच्छुक असलेल्या अजिनाथ केवटे यांनी म्हसवड येथे आयोजीत केलेल्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळाव्यात वरील दावा करताना राज्यातील सरकारवर व विद्यमान लोकप्रतिनिधीवर सडकुन टिका केली, यावेळी बोलताना केवटे यांनी सांगितले की राज्यातील सरकार हे फसवे सरकार आहे, त्यांनी फक्त आत्तापर्यंत सामान्य जनतेला झुलवत ठेवण्याचे काम केले आहे, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या सरकारने अनेक योजना सुरु केल्या असल्या तरी त्या सर्व योजना फसव्या आहेत. एकीकडे योजनेचा लाभ द्यायचा अन् दुसरीकडे अन्न, धान्याच्या किमतीत भरमसाठ वाढ करावयाची हे सरकारचे धोरण सामान्य जनतेचे कंबरडे मोडणारे आहे. फसव्या सरकारमध्येच आपले लोकप्रतिनिधी कार्यरत असुन त्यांनीही आजवर येथील जनतेला फसवण्याचे काम केले आहे. त्यांनी विकासकामाचे नुसते गाजर येथील जनतेला दाखवले आहे, यंदाच्या निवडणुकीत मला उमेदवारी मिळणार असल्याची सर्वाधिक शक्यता आहे, याबाबत दस्तुरखुद पवार साहेबांनीच आपल्या उमेदवारीला पसंती दिली असुन मी बहुजन चेहरा असल्याने पवार साहेब बहुजनवादी विचाराचे असल्यानेच मलाच येथील उमेदवारी मिळणार असल्याचे ही शेवटी केवटे यांनी सांगितले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश सराटे यांनी बोलताना सांगितले की म्हसवडसह पंचक्रोशीत केवटे यांच्या नावाचा चांगलाच दबदबा असुन केवटे यांनी लोकशाही मार्गाने विविध आंदोलने करीत अनेक प्रश्नांची सोडवणुक केलेली आहे त्यामुळे सामान्य जनता मोठ्या प्रमाणावर केवटे यांच्या पाठीशी आहे.
यावेळी युक्रांदचे राजकुमार डोंबे यांनी बोलताना सांगितले की केवटे यांच्या उपोषणामुळे म्हसवड शहराच्या एस.टी. बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लागला असुन त्यांच्याच आंदोलनामुळे पोलीस स्टेशन रोडवरील पाईपलाईन व खड्डयाचा प्रश्न सुटला आहे, केवटे यांनी आजवर अनेक आंदोलने करीत जनतेचे प्रश्न प्रशासनासमोर मांडले आहेत, त्यांची शहर व परिसरातील सामान्य जनतेच्या समस्यांवर बारकाईने नजर असते केवटे हेच सामान्य जनतेचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाच माण - खटावमधुन उमेदवारी मिळावी अशी सर्वसामान्य जनतेचीही इच्छा आहे.
प्रा. राजेंद्र माने यांनी बोलताना सांगितले की केवटे हेच सामान्य जनतेच्या मनातील आमदार आहेत त्यांच्यासारख्या लढवय्या नेतृत्वाची आज मतदार संघाला गरज असुन केवटे यांना उमेदवारी नक्की मिळेल अशी सामान्य जनतेला खुप आशा आहे, केवटे यांना उमेदवारी मिळाल्यास आम्ही जिवाचे रान करु अन् सामान्य जनतेचा उमेदवार म्हणुन त्यांना निवडुनही आणु असे ही शेवटी प्रा. माने म्हणाले. यावेळी म्हसवडसह परिसरातील सामान्य जनता मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती.०००
Comment List