जम्मूमध्ये दहशतवाद्यांचे नव्हे तर पाक कमांडोंचे थैमान
राज्याच्या माजी पोलीस महासंचालकांचा दावा
मागील काही वर्षापासून थंडावलेल्या जम्मू कश्मीर मधल्या दहशतवादी कारवाया मागच्या काही महिन्यांपासून पुन्हा जोर धरू लागल्या आहेत. काश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय लष्कर आणि अन्य सुरक्षा यंत्रणांनी आपली घट्ट पकड बनवल्यामुळे दहशतवादी गटांनी आता जम्मूकडे आपले लक्ष वळवले आहे. जम्मूमध्ये नुकत्याच घडलेल्या दहशतवादी कारवायात सुरक्षा दलाचे 40 हून अधिक जवान शहीद झाले आहेत. याची दखल घेऊन भारतीय लष्कर आणि निमलष्करी दलाच्या अडीच हजार जवानांना 500 कमांडोंचे पथक हिंसाग्रस्त भागात रवाना करण्यात आले आहे.
एकीकडे या कारवाया घडत असताना जम्मू कश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एस पी वेद यांनी पाकिस्तानकडून दहशतवादी नव्हे तर 600 प्रशिक्षित कमांडोंना पाकव्याप्त काश्मीरमधून भारतीय सीमेच्या आत घुसविण्यात आल्याचा दावा केला आहे. भारत सरकार किंवा संरक्षण दलांनी या दाव्याला दुजोरा दिला नसला तरीही अजून पर्यंत तो नाकारलेला ही नाही. मुख्याधारेतील भारतीय माध्यमांनी या निवृत्त अधिकाऱ्यांच्या दाव्याची दखल घेतली नसली तरीही विदेशी माध्यमातून त्याची दखल घेण्यात आली आहे. अधिकृतपणे संरक्षण दलांकडून जम्मू कश्मीर मध्ये 12, 15 अतिरेकी घुसखोरी करून आले असून ते विविध भागात दोन-तीन जणांच्या गटागटाने रहात असून दहशतवादी कारवायांची आखणी करत आहेत, असे सांगितले जात आहे.
मात्र, मागील काही काळात घडलेल्या दहशतवादी कारवायांमधील सफाई आणि त्यांच्याकडून सुरक्षा दलांना केला जाणारा प्रतिकार लक्षात घेता ते घडवून आणणारे माथेफिरू जिहादी दहशतवाद्यांच्या ऐवजी प्रशिक्षित कमांडो असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, एस पी वेद यांनी वर्णन केलेली घुसखोर कमांडोंची 500 ही संख्या पाहता त्यांनीच व्यक्त केल्याप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये आत्ता सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्यांपक्षा अधिक मोठे काहीतरी घडविण्याचा पाकिस्तानचा डाव असण्याची शक्यता आहे. एस पी वेद यांच्या शब्दात सांगायचे तर, पुन्हा एकदा कारगिल युद्धासाठी परिस्थिती निर्माण करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. या पाकिस्तानी कमांडोंनी भारतात आल्या आल्या मोठ्या कारवाया घडविण्यापूर्वी भारतातील आपला स्लीपर सेल पुन्हा कार्यरत करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे वेद यांचे म्हणणे आहे. मागच्या चार ते पाच दिवसात जम्मू काश्मीर पोलिसांनी सीमावरती भागातील जिल्ह्यांमधून दहशतवादी कारवायांना मदत करणाऱ्या काही स्थानिकांना अटक केली आहे. यावरून वेद यांच्या दाव्यात तथ्य असल्याचे दिसून येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेद यांनी जो दावा केला आहे त्यात थोडे जरी तथ्य असेल, तरी वेद यांना त्यांच्या व्यक्तिगत संपर्कातून मिळालेली माहिती लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांना मिळाली नसल्याची शक्यता अजिबातच असू शकत नाही. त्याशिवाय दोन आकडी संख्येतील माथा भडकवलेल्या दहशतवाद्यांशी लढण्यासाठी लष्कराचे हजारो जवान आणि त्यातही 500 प्रशिक्षित कमांडो जम्मू काश्मीरमध्ये पाठविले जाणार नाहीत.
मागील काही काळापासून जम्मू काश्मीरमधील दहशतवादी गटांचे कंबरडे मोडण्यात भारताला यश आले आहे. त्यामुळे दहशतवादी कारवायांना मोठ्या प्रमाणावर खीळ बसली आहे. दहशतवाद्यांना स्थानिक नागरिकांकडून मिळणारा पाठिंबाही जवळजवळ संपुष्टात आला आहे. राज्यातील फुटीरतावादी नेते सध्या विजनवासात गेल्यासारखे आहेत. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये बसून मोठ मोठ्या वल्गना करणाऱ्या दहशतवाद्यांच्या म्होरक्यांची दातखीळ बसली आहे. त्यांना दहशतवादी कारवायांसाठी मिळणारा पैशाचा ओघ आटला आहे. या दहशतवाद्यांना पोसणाऱ्या आयएसआय या पाक गुप्तचर यंत्रणेचीही नाचक्की होत आहे. त्यामुळे कातावलेल्या पाकिस्तानकडून जम्मू काश्मीर मध्ये अस्वस्थता निर्माण करण्याबरोबरच दहशतवादी चळवळ जिवंत आहे, हे दाखवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
जम्मू-काश्मीरला पूर्वी देण्यात आलेला विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर आतापर्यंत राज्यात राज्य सरकार अस्तित्वात नाही. केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून नायब राज्यपालांच्या हातात सर्व कारभार आहे. लवकरच जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. या निवडणुकांबाबत सामान्य नागरिकांमध्ये उत्कंठा आणि उत्साह आहे. पूर्वी रोज घडत असलेल्या दगडफेकी आणि श्रीनगरसारख्या शहरातही गजबजलेल्या ठिकाणी होणारे बॉम्बस्फोट यांना चाप बसल्याने जम्मू काश्मीरची जनता तुलनेने सुसह्य आयुष्याचा अनुभव घेत आहे. अर्थातच, त्या ठिकाणचे हे वातावरण पाकिस्तानला बघणरे आणि पचणारे नाही. त्यामुळे पाकिस्तान पेंढाऱ्यांच्या वेशात कमांडो घुसवून पुन्हा जुनाच रडीचा डाव खेळत असल्याची दाट शक्यता आहे. मात्र, भारतीय संरक्षण दले या घुसखोरांचा खात्मा करण्यास निश्चितच समर्थ आहेत. त्यातही पाकिस्तानने घुसवलेल्या घुसखोरांमध्ये खरोखरच पाकिस्तानी कमांडो असतील आणि त्यापैकी काही जिवंतपणे संरक्षण दलाच्या हाती लागले तर पाकिस्तानचा आधीच जगभरात प्रसिद्ध झालेला विश्वासघातकी चेहरा अधोरेखित करण्यात भारताला यश येईल.
Comment List