सत्संगात स्मशान!
भागा वरखडे
उत्तर प्रदेशातील हाथरस कायम या ना त्या कारणाने चर्चेत असते. मागे एका दलित युवतीवर सामूहिक अत्याचार झाल्याचे प्रकरण देशभर गाजले होते. आताही सिकंदरराव येथे आयोजित सत्संगात शेकडो बळी गेल्याने हाथरसची चर्चा सुरू आहे. देशात गेल्या दोन दशकांत झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटना आणि त्यात शेकडो बळी गेले असताना गर्दीचे व्यवस्थापन करण्यात अजूनही आपण कमी पडतो आहोत. एखादी घटना घडली, की राज्यकर्ते आणि प्रशासनाने अश्रू ढाळायचे. चौकशीचे आदेश द्यायचे आणि चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर त्याच्यातील निष्कर्ष पाहून धोरण ठरवण्याऐवजी ते बासनात गुंडाळून ठेवायचे, ही रीत झाली आहे. मागच्याच ठेच पुढचा शहाणा अशी मराठीत म्हण आहे; परंतु प्रशासन आणि राज्यकर्ते सोईस्कररीत्या ती विसरतात. पुन्हा ठेच लागल्यानंतरही समोर पाहून चालायचे लक्षातच राहत नाही. हाथरसच्या घटनेनंतर प्रश्न उभे राहतात, की आयोजकांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत कोणाची जबाबदारी निश्चित होणार? या अपघातातील दोषींना किती शिक्षा होणार? हाथरस चेंगराचेंगरीत निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार कोण? एवढ्या मोठ्या घटनेत एवढा मोठा निष्काळजीपणा कसा काय घडला? प्रशासनाने आयोजकांना सत्संगाला उपस्थित असलेल्या लोकांची संख्या का विचारली नाही? भोलेबाबांच्या पूर्वीच्या कार्यक्रमांमध्ये किती गर्दी जमा होत होती आणि आता किती गर्दी होणार आहे, याचा अंदाज आला नाही का? सत्संग संपल्यानंतर अचानक जमाव बाहेर कसा येऊ लागला? गर्दीला बाहेर पडण्यासाठी सत्संगाच्या ठिकाणी स्वतंत्र दरवाजे का बनवले गेले नाहीत? सत्संग संपल्यानंतर भोले बाबांचा ताखा तिथून का निघून गेला? बाबांच्या सोबत कोण लोक होते? सुरक्षा रक्षकांनी जमावाला थांबवून बाबांचा ताफा का बाहेर काढला? बाबा बाहेर पडल्यानंतर अचानक जमावाला एकत्र कसे निघून दिले? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले असले, तरी या व अन्य मुद्द्यांवर जोपर्यंत चौकशी होत नाही आणि दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत अशा घटना घडतच राहणार आहेत. हाथरस चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. ही समिती लवकरच राज्य सरकारला अहवाल देणार आहे. आता या प्रकरणी फिर्याद दाखल झाली असली, तरी ज्यांच्या सत्संगासाठी गर्दी झाली होती, त्यांचे नाव या फिर्यादीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
गर्दीत जेव्हा चेंगराचेंगरी होते, तेव्हा त्यात दुर्बलांचाच बळी जातो. मुंबई, मांढरदेवी, मक्का, मदिना, वैष्णव देवी किंवा अन्य ठिकाणची उदाहरणे घेतली, तर महिला आणि लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असते. हाथरसमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. सत्संगसारख्या पवित्र कार्यक्रमाला येण्यापूर्वी कानाकोपऱ्यातून जमलेल्या संगतीत एवढा मोठा नरसंहार घडेल याची कल्पनाही कोणी केली नसेल. या घटनांमधील गर्दीचे मानसशास्त्र समजून घेणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे हे आव्हान आहे. अशा मोठ्या घटनांमध्ये कोणत्याही वेळी गर्दीचे मानसशास्त्र समजून घेऊन त्यावर नियंत्रण ठेवण्याची तयारी करणे आवश्यक आहे. गर्दीतील सदस्य नेहमीच एखाद्या विषयावर मत मांडत असले, तरी त्यांचे वैयक्तिक विचार आणि कार्यशैली वेगळी असते; परंतु जेव्हा मोठ्या संख्येने लोक जमतात, तेव्हा स्थिरतेचा अभाव असतो. ते एका वेगळ्याच प्रकारच्या थ्रिलने प्रेरित झालेले असतात. सत्संगात सहभागी कोणी होण्यासाठी आला असेल, तर तो प्रथम एखाद्या व्यक्तिमत्त्वाने चालविला जातो; परंतु सत्संगाच्या समाप्तीबरोबर, त्याला गर्दीने चालविले जाते. जमावाचे मानसशास्त्र समजून घेतले, तर जेवढी चिडचिड होण्याची शक्यता असते, तेवढीच सुरक्षा व्यवस्था पाळण्याचीही भावना असते; परंतु केवळ स्थिरतेच्या अभावामुळे, विशिष्ट परिस्थितीत, सक्रिय जमाव निष्क्रिय गटात बदलतो. या गर्दीत स्वैराचार शिरल्याने चेंगराचेंगरी आणि अशा घटना घडतात. सामाजिक मानसशास्त्रात जमावाची मानसिकता, झुंड मानसिकता, समूहविचार किंवा गर्दीचे मानसशास्त्र असे त्याचे वर्णन केलेले आहे. १९५० च्या दशकात, संशोधकांनी सामाजिक नियमांशी सुसंगत होण्यासाठी लोक त्यांचे वर्तन किती सहज बदलतात याचा अभ्यास करण्यासाठी एक विशेष प्रयोग केला. या प्रयोगात असे आढळून आले, की सात जणांच्या गुप्त गटात एका व्यक्तीला बसवून प्रश्न विचारला असता, त्या गटाने चुकीचे उत्तर दिले. चुकीच्या उत्तराने तोही प्रभावित झाला. या प्रयोगात गुप्त सहकाऱ्यांनी मुद्दाम चुकीचे उत्तर दिले होते; मात्र त्या व्यक्तीला योग्य उत्तर माहीत असूनही त्याने चुकीचे उत्तर दिले. या उदाहरणावरून प्रत्येक व्यक्तीला त्याच्या रोजच्या जीवनात गर्दीचा कसा परिणाम होतो हे समजले पाहिजे. गर्दीची मानसिकता अनेक वेळा आपल्याला चुकीच्या दिशेने खेचते. जेव्हा आपण खेळ, सत्संग किंवा कोणत्याही स्पर्धेत सहभागी होत असतो, तेव्हा आपली मानसिकता जुळण्याची टक्केवारी आणखी वाढते. एकत्र भजन गाणे, टाळ्या वाजवणे, जयजयकार करणे याने आपल्यातील उत्साहाची पातळी वाढते. उत्साहाची ही स्थिती विचारांच्या पातळीवर लोकांना एकमेकांशी जोडते आणि क्रियाकलापांच्या पातळीवरदेखील त्यांना वेगळे करते. येथे जे घडले ते सामूहिक चेतनेच्या माध्यमातून रोखता आले असते. अशा कार्यक्रमांमध्ये वक्ता सर्वांना एकत्र संबोधित करत असेल, त्यांना नियम आणि कायद्याची भीती दाखवत असेल किंवा अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीची ओळख उघड करण्याविषयी बोलत असेल, तर यालाही आळा बसू शकतो; पण जमाव बेशिस्त झाला तर आपली ओळख उघड होण्याची भीती त्यांना असते. अशा परिस्थितीत ते एकतर हतबल होतात किंवा जीव वाचवण्यासाठी पळून जातात, अशा घटना घडतात.
हाथरस येथे भोलेबाबा सत्संग आटोपून कार्यक्रमस्थळावरून बाहेर पडत असताना चेंगराचेंगरी झाली. दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या पायाची धूळ घेण्यासाठी अनुयायी भोलेबाबांच्या गाडीच्या मागे धावले. त्याचवेळी मागून गर्दीचा दबाव वाढल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात लोक एकमेकांवर पडू लागले. पावसामुळे घटनास्थळाभोवती चिखल झाला होता. त्यामुळे लोकांचा गुदमरून मृत्यू झाला. गर्दीत पडून, चिरडून अनेकांचा मृत्यू झाला. ‘या घटनेला जो कोणी जबाबदार असेल, त्याला सोडले जाणार नाही’, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत सांगितले असले, तरी तो फुकाचा दम ठरू नये. घटनास्थळी किमान एक लाख लोक होते आणि जेव्हा बाबा निघू लागले, तेव्हा त्यांच्या पायांना स्पर्श करण्यासाठी गर्दी झाली. लोक परत येत असताना ते घसरून एकमेकांवर पडू लागले. कारण जवळच्या नाल्यातून वाहत असलेल्या पाण्यामुळे जमिनीचा काही भाग दलदलीचा झाला होता. कार्यक्रमस्थळी केलेली व्यवस्था जमलेल्या गर्दीच्या आकारासाठी अपुरी होती. चिखलात घसरल्याने लोक एकमेकांवर पडले आणि मागून येणाऱ्या जमावाने त्यांना तुडवले. स्थानिक प्रशासनाने कार्यक्रमस्थळाच्या बाहेर सुरक्षा पुरवली होती, तर अंतर्गत व्यवस्था आयोजकांना पाहावी लागते. या कार्यक्रमानंतर चेंगराचेंगरीमुळे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांपासून ते आयोजकांपर्यंत सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सत्संगासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सत्संगासाठी परवानगी दिल्याचे स्पष्ट झाले आहे; परंतु सत्संग स्थळी येणाऱ्या गर्दीचा अंदाज त्यांनाही आला नाही. अशा स्थितीत चूक कुठे झाली आणि या घटनेला नेमके कोण जबाबदार आहे, हे समितीचा अहवाल आल्यानंतर समोर येईल. या अहवालात पोलिस, प्रशासन आणि आयोजक यांच्यापैकी कोणाची चूक उघडकीस आली, तर कायद्यानुसार शिक्षा होईल. या घटनेला जो कोणी जबाबदार असेल, त्याच्यावर निरपराधांच्या हत्येची कारवाई केली जाऊ शकते. भारतीय न्याय संहिता २०२३ मध्ये दिलेले कलम १०५ दोषी मनुष्यवधाची व्याख्या करते. त्याच्या शिक्षेचा उल्लेख कलम १०५ मध्ये करण्यात आला आहे. प्रशासनाने कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी दिली असल्याने, हाथरस जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची चौकशी होईल. तेथे सुरक्षा व्यवस्था केल्याचे अधिकारी सांगत आहेत; मात्र सर्व चोख बंदोबस्त असताना चेंगराचेंगरी कशी व का झाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे प्रशासकीय दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गर्दीचा अंदाज आणि व्यवस्थापनात मोठी त्रुटी नाकारता येत नाही. तपासात दोषी आढळल्यास अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई निश्चित आहे. आयोजकांनाही अटक केली जाईल. हाथरसच्या या भीषण घटनेतून प्रशासकीय यंत्रणा किती धडा घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Comment List