Vidhan Sabha 2024 | विधानसभा निवडणूक दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी आव्हानात्मक
नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यात देखील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांना मताधिक्य मिळाल्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत राज्याचे सहकार मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या दृष्टीने आंबेगाव विधानसभेची निवडणूक जड जाण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.
दरम्यान आंबेगाव तालुक्यात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( Sharad Pawar गट ) नेतृत्व एकेकाळचे दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक देवदत्त निकम करत असून त्यांनी तालुक्यात आपली राजकीय पकड घट्ट केली आहे.काही दिवसांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( Ajit Pawar गट ) आंबेगाव तालुक्यातीलच असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना स्वतःच्या तालुक्यात देखील मताधिक्य मिळाले नाही शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करत असलेल्या देवदत्त निकम यांनी कोल्हे यांच्या समवेत तालुक्यात प्रचार सभांच्या माध्यमातून मताधिक्य मिळवून देण्यात यश मिळवले . त्यातच शिरूर तालुक्यातील 39 गावांनी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना फटकारले तर महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या डॉ.अमोल कोल्हे यांना 15000 हून अधिकचे मताधिक्य दिले .
लोकसभा निवडणुकीत शिरूर तालुक्यातील आंबेगाव विधानसभेला जोडलेल्या 39 गावांचा वळसे पाटलांचा करिष्मा यावेळी चालला नाही , त्याला कारणही तसेच आहे . कारण 39 गावांच्या पाण्याचा प्रश्न गेल्या काही वर्षापासून प्रलंबित असून कलमोडी धरणाचे पाणी 39 गावांना मिळावे अशी येथील मतदारांची अपेक्षा आहे . मात्र अद्याप पर्यंत या मतदारांची अपेक्षा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील पुर्ण करू न शकल्याने वळसे पाटलांचा करिष्मा लोकसभेच्या निवडणुकीत चालला नाही असे बोलले जात आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांची वळसे पाटील यांनी अचानक सोडलेली साथ ही बाब देखील मतदारांना रुचलेली नसल्याचे झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले .त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदार राजा वळसे पाटलांना स्वीकारतील का ? हा खरा प्रश्न आहे . तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेतृत्व करत असलेले देवदत्त निकम यांनी मात्र तालुक्यात जोरदार राजकीय मुसंडी मारल्याचे दिसून येते .जनतेच्या सुखदुःखात सातत्याने देवदत्त निकम पाहायला मिळत असल्याचे सध्याचे चित्र आहे तर या उलट वळसे पाटील कुटुंबातील व्यक्ती जनसंपर्कात कमी पडल्याचे चित्र पाहायला मिळते .
विधानसभेच्या निवडणुका तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहे . आंबेगाव तालुक्यात महाविकास आघाडीच्या वतीने शरदचंद्र पवार गटाचे देवदत्त निकम यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली आहे .त्या अनुषंगाने निकम यांनी तालुक्यातील गावागावात जनसंपर्क देखील वाढविला असल्याचे दिसून येते मात्र महाविकास आघाडीतील तालुक्यातील उबाठा गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर आणि जिल्हा संघटक म्हणून काम करत असलेले प्रा. राजाराम बाणखेले हे देखील वळसे पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून त्यांनी देखील आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून जोरदार प्रयत्न चालवले आहेत. आंबेगाव तालुक्यात शिवसेनेचे सुमारे साठ हजार मतदार असून या मतदारांच्या आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांच्या जोरावर आपण निवडणूक जिंकू शकतो असा दावा भोर यांनी केला आहे . त्यामुळे महाविकास आघाडीची आंबेगाव तालुक्यातील उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी उबाठा गटाच्या सुरेश भोर यांनी देखील राजकीय फिल्डिंग लावली आहे .
तालुक्यात महायुतीचे नेते सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील ( MLA Dilip Walse-Patil ) यांनी गेल्या 30-35 वर्षात विकास कामे केली असली तरी जनतेच्या सुखदुःखात सहभागी असणारा नेता हवा असा सूर तालुक्यातील जनतेतून अळविला जात आहे .त्यामध्ये प्रामुख्याने शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रामीणचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम उजवे ठरले आहेत . सातत्याने जनसंपर्कात राहून जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत असल्याने निकम यांची राजकीय बाजू सध्या तरी उजवी ठरत असल्याचे पाहायला मिळते .
एकूणच शिवसेना शिंदे गटातून काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात सामील झालेल्या माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील ( Shivajirao Adhalrao Patil ) यांचे कार्यकर्ते आणि अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वळसे पाटील यांचे कार्यकर्ते यांचे विधानसभा निवडणुकीत मनोमिलन होणार का ? हे येणारा काळच ठरवेल . मात्र होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत वळसे पाटील यांच्या दृष्टीने आंबेगांव विधानसभेची निवडणूक कठीण जाण्याची चिन्हे दिसू लागली आहे .
00000
Comment List